भिमराव आंबेडकर आणि सयाजीराजे गायकवाड-| dr. babasaheb ambedkar


 

आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये पुरोगामी विचारसरणीचे जे दोन अभूतपूर्व राजे होऊन गेले त्यांपैकी एक म्हणजे बडोदा संस्थानचे राजे महाराजा सयाजीराव गायकवाड हे होय. उच्च-नीच असा भेद यांना आवडत नसे. दलितोद्धाराच्या अत्यंत कठीण सुधारणेत महाराजांनी अपूर्व कार्य केल्याबद्दल सुधारकांनी त्यांना 'पतित पावन' अशी पदवी बहाल केली होती. दलित समाजातील मुले शिकली पाहिजेत, अशी त्यांची तळमळ होती. यासाठी त्यांनी दलित बांधवांच्या मुलांना शिक्षणासाठी सहाय्य करण्याची घोषणा केली होती.

 

भिमराव आंबेडकर आणि सयाजीराजे गायकवाड


  • ·       भीमरावांच्या उच्च शिक्षणाचे आधारस्तंभ

 

इकडे बुद्धिवान भीमराव मॅट्रिक उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षणाच्या चिंतेत होते. वडील रामजींच्या पेन्शनमध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत नव्हता. वडील कर्जबाजारी झाले होते. त्यामुळे मोठा भाऊ आनंदराव शिक्षण सोडून नोकरी करीत होता. अशाही परिस्थितीत भीमरावांची शिकण्याची तीव्र इच्छा होती आणि म्हणतात ना 'हिम्मत-ए-मर्दा, मदते-ए-खुदा' याप्रमाणे गुरुवर्य कृष्णाजी केळुसकर आणि दामोदर यंदे यांनी भीमरावांना महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले.

एक दिवस यंदे आंबेडकरांना घेऊन मुंबईस मलवार हिलवरील जय महाल पॅलेसमध्ये सयाजीराव महाराजांना भेटण्यासाठी गेले. महाराजांनी विचारलेल्या - प्रश्नांची उत्तरे भीमरावांनी समाधानकारक दिली महाराज खुश झाले व त्यांनी भीमरावांच्या उच्च शिक्षणासाठी दरमहा पन्नास रुपये शिष्यवृत्ती मंजूर केली 'जा, चांगला अभ्यास करा, चांगली हुशारी दिसून आल्यास तुम्हास अधिक मदत मिळेल. ' महाराजांचे उत्तेजनपर शब्द ऐकताच आंबेडकरांच्या रोमारोमांत चैतन्य सळसळू लागले. त्यांच्या अंतःकरणात उत्तुंग महत्त्वाकांक्षेचे बीज पेरले गेले आणि ३ जानेवारी १९०८ साली मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात भीमराव दाखल झाले.

महाराजांनी केलेल्या अर्थसहायाचा आंबेडकरांनी चांगल्या रीतीने उपयोग करून घेतला. महाराजांचे शब्द खरे करुन दाखविले. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात शिक्षण घेत असताना येथेही त्यांना पाणी पिण्यास मज्जाव केला गेला. या महाविद्यालयातील प्रा. म्युल्लर हे भीमरावांना कपडे व पुस्तके देत असत. अस्पृश्यतेचा सामना करीत महाराजांनी दिलेल्या शिष्यवृत्तीच्या बळावर ते इ. स. १९१० साली इंन्टरमीडीएट व इ. स. १९१२ साली बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. याच वर्षी त्यांना एक मुलगाही झाला. त्याचे नाव यशवंत.

  •       भीमरावांना पितृशोक   


या काळी भारतीय राजकीय चळवळीने उग्ररूप धारण केले होते. इंग्रज सरकारने स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या अनेक नेत्यांना तुरुंगाचा रस्ता दाखविला होता. देशातील अशा ज्वालाग्रही घटनांचा परिणाम भीमरावांच्या मनावर होत होता. नुकतेच भीमराव पदवीधर झाले होते. परिस्थितीची जाणीव
, अवांतर वाचन व सततच्या चिंतनामुळे भीमरावांची वैचारिक प्रगती खूप झाली होती. आपली नाजूक परिस्थिती लक्षात घेता आपले उच्च शिक्षण पार पाडण्यास ज्यांनी आर्थिक साहाय्य दिले, त्यांची नोकरी करावी व बडोदे सरकारचे ऋण फेडावे असा विचार केला. परंतु त्यांच्या वडिलांच्या मनात भीमाने बडोद्यास जाऊन नोकरी करावी असे नव्हते. त्यांनी भीमरावांचे मन वळविण्याचा नाना प्रकारे प्रयत्न केला परंतु भीमराव आपल्या भूमिकेवर ठाम होते. स्वतः ठरविल्याप्रमाणे जानेवारी १९१३ च्या शेवटच्या आठवड्यात ते बडोद्याला आले. येथे कसलीच सोय नव्हती. पंडित आत्माराम आर्यसमाजिस्ट या पंजाबी हिंदने भीमरावांची आर्य समाजाच्या कचेरीत राहण्याची व महारवाड्यात जेवणाची सोय केली. त्यांना कोणती नोकरी द्यावी याविषयी अधिकाऱ्यांमध्ये एकमत होईना. दिलेले कोणतेही काम तात्काळ संपवून भीमराव वाचीत बसत असत. याचा इतरांना राग येत असे. अस्पृश्य म्हणून त्यांना ते दर ठेवीत. एक एक दिवस त्रासाचा जात असे. साधारणतः अकराच दिवस झाले होते तोच त्यांचे वडील रामजी खूप आजारी असल्याची तार आली. एकदम भीमरावांचे अंतःकरण हलले 

'प्रेम मंदिर हलले, लागे कळस फुटाया ।

आज घायाळ भीमराव, गेले पित्याला भेटाया ।।'

तात्काळ भीमरावाने आठ दिवसांची रजा घेऊन मुंबई गाठली. येताना सुरत स्टेशनवर उतरून आपल्या वडिलांना आवडणारी मिठाई आणली पण दुर्भाग्य ते मिठाई खाऊ शकले नाहीत. २ फेब्रुवारी १९१३ चा तो दिवस भीमरावांना डोळे भरून पाहताच रामजींनी आपला प्राण सोडला. जणू हा शेवटचा श्वास आपल्या प्राणाहून प्रिय मुलाला एकदा पाहण्यासाठीच रोखून धरला होता की काय कुणास ठाऊक ? वयाच्या सहाव्या वर्षी आई आणि आता पितृछत्रही हरवले.

भीमरावांचा आधारवड गेला. शोकाकुल भीमरावांनी बडोद्याच्या अधिकाऱ्यांना आपण येणार नसल्याचे कळविले. मात्र सयाजीराव महाराज मुंबईला आले तेव्हा भीमरावांनी आपला बडोद्याचा अकरा दिवसांचा दाहक अनुभव कथन केला. महाराजांना ते पटले असावे म्हणूनच महाराजांनी अमेरिकेत विद्याभ्यास करण्यासाठी भीमरावांना पुन्हा एकदा १ जून १९१३ साली तीन वर्षासाठी दरमहा साडेअकरा पौन्डांची शिष्यवृत्ती बहाल केली.' शिष्यवृत्तीची मुदत १५ जून ते १४ जून १९१६ पर्यंत होती. संस्थानाकडून पॅसेज आऊट-फिट खर्च व तीन महिन्याची एकूण १९६३ रुपये शिष्यवृत्ती घेतली आणि अमेरिकेहून परतल्यावर किमान दहा वर्षे बडोदा संस्थानात नोकरी करण्याच्या अटीवर जुलै १९१३ साली भीमराव न्यूयॉर्कला (अमेरिकेत) रवाना झाले.

·      

  • उच्च शिक्षणासाठी अमेरिकेस प्रयाण

  २० जुलै १९१३ साली भीमराव न्यूयॉर्कला पोहोचले. तेथे कोलंबिया विद्यापीठात राज्यशास्त्र शाखेत त्यांनी प्रवेश घेतला. प्रथमतः ते विश्वविद्यालयाच्या वसतिगृहात राहिले. परंतु तेथील अर्धे-कच्चे व किळसवाणे अन्न यांची त्यांना शिसारी आल्यामुळे जेथे हिंदी विद्यार्थी राहात असत, त्या सर्व कुटुंबात ते राहावयास गेले. त्यानंतर नवलमथेना या विद्यार्थी मित्राबरोबर लिव्हिंगस्टन हॉल शयन मंदिरामध्ये ते राहू लागले. न्यूयॉर्कमधील आंबेडकरांचे जीवन हा एक अपूर्व असा अनुभव. तेथील विद्यार्थ्यासंगे आंबेडकर बरोबरीने बोलत, चालत, जेवत, फिरत. सर्वच ठिकाणी समतेचे वातावरण. ते जीवन हा त्यांना एक साक्षात्कारच वाटे. त्या नवीन जगाने त्यांच्या मनाचे क्षितीज वाढविले. त्यांचा अंतरात्मा एक प्रकारच्या नवीन तेजाने स्फुरू लागला. आता आपल्या भारतातील दलित बांधवांनाही अशी समतेची वागणूक, विलायतेतील शिक्षणाचा लाभ मिळावा असे त्यांना वाटू लागले. ही अंतर्भावना व्यक्त करण्यासाठी आंबेडकरांनी अमेरिकेहून आपल्या वडिलांच्या मित्राला एक पत्र लिहिलेहि पत्रात त्यांनी पददलितांच्या दैन्यावर एक रामबाण उपाय सुचविला. तो म्हणजे पददलित समाजात शिक्षणाचा प्रसार करणे हे होय. कार्यकर्त्यांनी शिक्षणाच्या प्रसारासाठी झटले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्या पत्रात त्यांनी शेक्सपिअरच्या नाटकातील 'प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात जेव्ह संधीची लाट येते तेव्हा तिचा योग्य प्रकारे त्याने उपयोग केला तर त्या मनुष्यास वैभव प्राप्त होते.' हे वचन त्यांनी पत्रात उद्धृत केले होते आणि त्याचा स्वतःही कटाक्षाने आपल्या जीवनात उपयोग केला.

त्याच पत्रात दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला होता तो म्हणजे धर्मभोळेपणा, दैववाद, नशीब या प्रवृत्तीवर हल्ला करताना ते म्हणाले की, "आई- बाप मुलांना जन्म देतात, कर्म देत नाहीत हे म्हणणे ठीक नाही. आई-बाप मुलांच्या आयुष्याला वळण लावू शकतात ही गोष्ट आपल्या लोकांच्या मनावर बिवून जर आपण मुलांच्या शिक्षणाबरोबरच मुलींच्याही शिक्षणासाठी धडपड केली तर आपल्या समाजाची प्रगती झपाट्याने होईल' एवढा सखोल विचार त्यांनी विद्यार्थि अवस्थेत असताना मांडला. यावरून त्यांच्या विचारांची खोली येते. या पत्रात त्यांनी अमेरिकेत मात्र त्यांना समतेची वागणूक मिळाली. याच वातावरणाचा लाभ भारतातील आपल्या दलित बांधवांनाही मिळावा, असे त्यांना वाटू लागले. 

प्रत्येक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सुख-विलासाकडे, रमून जाण्याकडे सामान्यतः कल असतो. परंतु ध्येयनिष्ठ आंबेडकरांचे मन तशा जीवनास अनुकूल नव्हते. शिवाय पैसा तर जवळ नव्हताच. त्यामुळे पोट मारून, एक वेळचे जेवण चुकवून शिष्यवृत्तीच्या पैशातून जुनी पुस्तके विकणाऱ्या ग्रंथ विक्रेत्याकडून त्यांनी अनेक ग्रंथ विकत घेतले. शिवाय शिष्यवृत्तीच्या पैशातून बचत करून घरी पत्नीला घरप्रपंचासाठी पैसे पाठवावे लागत. अठरा-अठरा तास अहोरात्र अभ्यास करून त्यांनी दोन प्रबंध लिहिले. आंबेडकरांचा अमेरिकेतील हा शैक्षणिक प्रवास म्हणजे धुरंधर राजकारणी पुरुषाच्या जीवनक्रमाची ती तपस्यापूर्वक चाललेली साधनाच होती. एका राज्यघटनापटूची ती एक प्रकारची तपस्याच होती.

भारताप्रमाणेच तेथेही एडवीन आर. ए. सेलिग्मन नावाचे एक प्राध्यापक बाबासाहेबांवर खूप प्रेम करीत. प्रबंध लेखन व इतर कामी त्यांची खूप मदत झाली. १९१५ साली 'एशन्ट इंडियन कॉमर्स - प्राचीन भारतातील व्यापार' हा ४२. पृष्ठांचा शोध निबंध लिहून वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी कोलंबिया विद्यापीठाची.. एम. ए. ची पदवी संपादन केली.

हा अभ्यास चालू असतानाच तेथे त्यांनी समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, इतिहास, राजकारण या विषयांसाठी सचोटीने अभ्यास केला व त्यांनी आपला दुसरा प्रबंध 'भारतातील जातिसंस्था, तिची उत्पत्ती आणि विकास (कास्टस् इन इंडिया, देअर मेकॅनिझम, जेनिसिस अॅण्ड डेव्हलपमेंट)' हा प्रबंध लिहिला व त्याचे वाचन प्रा. डॉ. गोल्डन वेझर यांच्या मे १९१६ च्या वाद-कथा सभेत केले. या निबंधात त्यांनी मनूपूर्वी जातिसंस्था अस्तित्वात असून त्याला पुष्टी देणाऱ्या , मनुवर व जातीव्यवस्तेवर खरमरीत टीका केली आहे.

    

  • पीएच. डी. पदवी बहाल


नंतर अर्थशास्त्र व राजनीती या विषयांच्या सखोल अभ्यासाने ब्रिटिश राज्यकारभाराची तपासणी त्यांनी सुरू केली. 'भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा : एक ऐतिहासिक पृथक्करणात्मक परिशीलन' (National Divident of India : A Historic and Analytical Study) नामक प्रबंध जून १९१६ मध्ये कोलंबिया विद्यापीठाने मान्य केला.

पुढे आठ वर्षांनी १९२५ मध्ये लंडनमधील 'पी. एस. किंग अँड सन्स' य प्रकाशन संस्थेने 'ब्रिटिश भारतातील प्रांतिक वैत्तिक उत्क्रांती' (दी इव्हॅल्यूशन ऑफ प्रोव्हिशन्शल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया) ह्या नावाने तो प्रबंध प्रसिद्ध झाला. या ग्रंथाच्या छापील प्रती नियमाप्रमाणे कोलंबिया विद्यापीठास सादर करताच विद्यापीठाने रीतसर त्यांना 'डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी' (पीएच. डी.) ही अत्युच्च पदवी प्रदान केली. या ग्रंथाने आंबेडकरांना पीएच. डी. तर मिळवून दिलीच परंत पार्वजनिक वित्ताच्या क्षेत्रात प्रथमांक मिळवून दिला. अशा प्रकारचा एका भारतीयाने लिहिलेला आगळा-वेगळा पण वास्तव सांगणारा हा पहिलाच 'वित्तग्रंथ' होय.

या प्रबंधाचे मार्गदर्शक आणि गुरु प्रा. सेलिग्मन यांनी या ग्रंथाविषयी म व्यक्त करताना प्रस्तावनेत असे म्हटले आहे की, "या विषयाचा इतका सखोल आणि सांगोपांग अभ्यास अन्य कोणीही केल्याचे आपणास माहीत नाही." यावरून या ग्रंथाची मौलिकता व महत्त्व लक्षात येते.

या ग्रंथात ब्रिटिश नोकरशाही, साम्राज्यशाही आणि भारतातील सामाजिक प्रतिगामी शक्ती यावर त्यांनी चांगलेच ताशेरे ओढले आहेत.

  • लंडनला रवाना

अमेरिकेतून पीएच.डी. पदवी घेतल्याने आंबेडकरांच्या नावाआगोदर डॉक्टर हे सन्मानजनक बिरुद लागले होते. लंडनमध्ये कायद्याचा आणि अर्थशास्त्राचा अभ्यास करण्याची बडोदानरेशांकडून त्यांनी संमती मिळविली होती त्यामुळे १९१६ सालचा तो जुलै महिना अमेरिकेत शिक्षण संपवून डॉ. आंबेडक इतर शिक्षणासाठी लंडन येथे दाखल झाले.

ऑक्टोबर महिन्यात कायद्याच्या अभ्यासासाठी 'ग्रेज इन' आणि अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स' या महाविद्यालयात प्रवेश मिळविला. मोठ्या हिमतीने तेथेही त्यांनी अभ्यासास सुरुवात केली. अर्थशास्त्र विषयातील त्यांची प्रगती पाहून एक परीक्षा वगळून एकदम त्यांना 'डी.एस्सी.' च्या परीक्षेला बसण्याची परवानगी दिली. त्यामुळे डी.एस्सी. च्या प्रबंधाचीही तयारी त्यांनी जोमाने सुरू केली पण दुर्भाग्य बडोदा- नरेशांच्या शिष्यवृत्तीची कालमर्यादा संपली. त्यामुळे बडोद्याचे दिवाण मनुभाई मेहता यांनी भीमरावांना भारतात परत बोलाविले. परतीची तार आल्याचे समजताच हिमालयाच्या सर्वोच्च शिखरावरून अचानक पाय घसरून पडल्यागत त्यांची स्थिती झाली. नाइलाजाने ऑक्टोबर १९१७ पासून चार वर्षांच्या आत ठरलेला अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्याची अनुमती लंडन विद्यापीठाकडून घेऊन डॉक्टर मायदेशी परतले. साधारणतः मॅट्रिकनंतर (१९०८ ते १९१६) पीएच.डी पर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी सयाजीराजे गायकवाड यांनी डॉ. आंबेडकरांना आर्थिक साहाय्य केले म्हणून ते खऱ्या अर्थाने आंबेडकरांच्या उच्च शिक्षणाचे आधारस्तंभ ठरतात.

·      बडोदा संस्थानात नोकरी व अस्पृश्यतेचा सामना

२१ ऑगस्ट १९१७ रोजी भीमराव लंडनहून मुंबईला आले. डॉक्टर ही खूप मोठी मानाची पदवी घेऊन डॉ. आंबेडकर भारतात आल्यामुळे अनेकांना आनंद झाला. सर्वांनी एकत्रित येऊन डॉ. आंबेडकरांच्या भव्य सत्काराचे आयोजन केले. त्या वेळी डॉ. आंबेडकर आपल्या चाहत्यांना म्हणाले, "बंधूंनो माझा सत्कार नको, मला मानपत्र नको, मला संधी मिळाली म्हणून मी शिकलो, इतरांना संधी 1 मिळाली तर ते सुद्धा शिकतील, माझ्या मानपत्रासाठी तुम्ही जो पैसा जमविला असेल तो आपल्या दलित समाजातील होतकरू व अभ्यासू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी खर्च करा." यावरून त्यांची परोपकारी वृत्ती व समाजविषयीची तळमळ, मनाचा मोठेपणा लक्षात येतो.

LAKSHMI VILAS PALACE, VADODARA 


 बडोदा सरकारशी झालेल्या करारानुसार बडोद्याला जायचे त्यांनी ठरवले. बडोस्याला जाण्यासाठीही पुरेसे पैसे त्यांच्यासाठी नव्हते. प्रकाशकाने दिलेले काही पैसे पत्नीकडे घरखर्चासाठी देऊन उर्वरित पैश्यांमध्ये आपल्या भावाला घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर बडोद्याला गेले. तेथे स्वतःच्या पिएच.डी प्रभांधाव्र तयार केलेला ग्रंथ सयाजीराव गायकवाडांना अर्पण करून आंबेडकरांनी महाराजाची कृतज्ञता व्यक्त केली. डॉ. आंबेडकरांना अर्थमंत्री करण्याचा सयाजीराव महाराजांचा विचार होता पण त्यांना विविध खात्यांचा अनुभव नसल्याने महाराजांनी • आंबेडकरांना लष्करी चिटणीस म्हणून नेमले. भीमरावांची सर्वतोपरी व्यवस्था करावी, अशी आज्ञा महाराजांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली होती.

परंतु 'स्पृश्य हिंदू' याच जन्मजात पदवीमुळे स्वतःला सर्वश्रेष्ठ मानणाऱ्या या पामरांनी डॉ. आंबेडकरांना अपमानकारक वागणूक दिली. सचिवालयातही त्यांचे सहकारी ते जातीने महार असल्याने त्यांच्याशी तुच्छतेने वागत. त्यांचा विटाळ होईल म्हणून शिपाईसुद्धा त्यांच्या टेबलावर कार्यालयीन कागदपत्रे किंवा फायली दुरून फेकीत असत. राहायला कुठेही जागा मिळत नाही म्हणून आपले नाव बदलून शहरातील एका 'पारसी' वसतिगृहात ते राहू लागले परंतु ही व्यक्ती जातीने महार आहे समजल्यावर त्यांना तेथून हाकलून देण्यात आले. 'मी हिंदू आहे' असे डॉ. आंबेडकरांनी सांगताच 'तू कोण आहेस आम्हांला माहीत आहे, तू अगोदर बाहेर पड.' असे भयंकर कर्कश आवाज त्यांच्या कानावर आदळले. तेवढा भयंकर अपमान सहन करीत अत्यंत संयमाने डॉ. आंबेडकरांनी त्या पारसी व्यक्तींकडे काही तासांची मुदत मागितली. इतरत्रही कुणी हिंदू किंवा मुसलमान त्यांना थारा देत नव्हता.


शेवटी सयाजीराव महाराजांकडे भेटण्यासाठी गेले. ते प्लेगचे दिवस होते. महाराज म्हैसूरला जाण्याच्या गडबडीत होते. त्यांनी दिवाणास भेटण्यास सांगितले. दिवाणाने या बाबतीत लक्ष घातले नाही. परिस्थिती एवढी गंभीर असेल असे कदाचित महाराजांनाही वाटले नसेल.

अशा स्थितीत भुकेने नि तहानेने व्याकुळ झालेला तो ज्ञानी पुरुष एका झाडाखाली बसून ढसाढसा रडला. वर आकाश, खाली जमीन हाच काय तो त्यांना त्या दिवशी आसरा होता. या प्रसंगी या पंडितवर्याला कळून चुकले की अस्पृश्य कितीही विद्वान झाला आणि योग्यतेस चढला तरी अस्पृश्य हा अस्पृश्यच राहतो. त्याच्या बाबतीत हिंदूंची अमानुष रूढी, त्यांचे अज्ञान, त्यांचे निर्दय आचार त्यांची कठोरता कमी होत नाही अशी त्यांची खात्री झाली. अशा खिन्न आणि निराश अवस्थेत डॉ. आंबेडकर बडोद्याहून मुंबईस परतले.


 

·      

1.    महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे शैक्षणिक व कृषी विषयक कार्य

2.    डॉ.आंबेडकरांची पात्रता काय आहे?

3.    डॉ भीमराव आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला?

4.    डॉ बी.आर. आंबेडकर कोण होते त्यांनी भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका कशी बजावली?

5.    डॉक्टर आंबेडकरांचे जातिव्यवस्थेचे निर्मूलन हे व्याख्यान कुठे आयोजित करण्यात आले होते?

6.    आंबेडकरांनी भारतातील जातिव्यवस्थेवर टीका कशी केली?

7.    डॉ.आंबेडकरांची पात्रता काय आहे?

8.    सयाजीराव गायकवाड बाबासाहेब आंबेडकर

 

या पुढील माहिती पुढच्या ब्लोग मध्ये दिली जाईल 🙏